उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 193 RTPCR अहवालांपैकी 70 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 109 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 14 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 566 Rapid Antigen Test पैकी 98 रुग्ण पॉझिटिव्ह तर 468 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5850 झाली आहे तर 3697 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1999 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 154 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------------
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन.
नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते. त्यातच आज अप्पांचे निधन झाले.
राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोण होते डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर महाराज?
- लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजांपैकी एक. वयाच्या 104 वर्षीही ते कार्यमग्न असे.
- अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत.
- लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले.
- वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे उत्तम संबध होते.
-----------------------------------------------------------
शेतकऱ्याने लाज राखली; एकमेव कृषी क्षेत्रात सकारात्मक वाढ;
जीडीपी उणे २३.९ टक्के रसतळाला; अर्थव्यवस्थेचे तीनतेरा!
कालच एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचा विकास दर जाहीर झाला. जीडीपीमध्ये ४० वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. करोना लॉकडाउनमध्ये सर्व क्षेत्रात शांतता असताना देशाचा गाडा हाकला तो एकट्या शेतकऱ्याने अर्थात कृषी क्षेत्राने होय.
या वर्षी कृषी क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यात सकारात्मक वाढ झाली आहे. चांगला मान्सून, लॉकडाउनमुळे प्रवासी मजूर गावी पोहोचल्यामुळे कृषी कार्यात वेग आला. यामुळे कृषी आणि शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की देशाची अर्थव्यवस्थेचा गाडा तेच खऱ्या अर्थाने चालवतात. जेव्हा इतर क्षेत्रात शांतता होती तेव्हा कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेची साथ सोडली नाही.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये GDP ५.२ टक्क्यांनी वाढला होता. पण या वर्षी सरकारने २५ मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. पण अपवाद ठरला तो कृषी क्षेत्राचा.
पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राने ३.४ टक्के इतकी वाढ नोंदवली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या कालावधीत कृषी क्षेत्रातील वाढ ही ३ टक्क्यांनी झाली होती. याचा अर्थ संकट काळात कृषी क्षेत्राने अधिक चांगली कामगिरी केली. लॉकडाउनच्या काळात संपूर्ण देश ठप्प होता. या काळात शेतकरी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा ओढत होता, हेच या आकडेवारीतून समोर आले आहे.
'करोना'मुळे अर्थव्यवस्थेचे तीनतेरा!
व्हायरसला रोखण्यासाठी देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात देशात उद्योगधंदे ठप्प पडले. बेरोजगारी वाढली देशांतर्गत वस्तूंचा खप कमी झाला. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर (GDP) उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.
सरकारने अर्थव्यवस्थेतील प्रमुख आठ घटकांच्या (core sector) वृद्धीविषयक आकडेवारी जाहीर केली. ज्यात जुलै महिन्यात या प्रमुख आठ क्षेत्रांच्या वाढीचा दर उणे ९.६ टक्के राहिला. जून महिन्याच्या तुलनेत यात किंचित सुधारणा झाली. जून महिन्यात तो उणे १२.९ टक्के होता.
-----------------------------------------------------------