नवी दिल्ली - झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग आता काहीसा कमी झाल्याची पॉझिटिव्ह बातमी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच आज 10,000 पेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा गुणाकार आता मंदावला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी या आधी 10.5 दिवस लागत होते. आता हा दर 12 दिवसांवर आला आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वात कमी आहे. एकूण रुग्णांच्या केवळ 3.2 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो, अशी सध्या आकडेवारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शनिवारपर्यंत भारताने एकूण 10 लाख कोरोना टेस्ट केल्या आहेत. एका दिवसात जवळपास 74 हजार टेस्ट केल्या जात असल्याचंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.