नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटात मोदी सरकार दुसरं मोठं आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. याची तयारी सरकारने सुरू केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ज्या क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे त्यांना या पॅकेजमधून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. ही समिती सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, हवाई वाहतूक, कृषि आणि कृषी संबंधित उद्योगांच्या अडचणी जाणून घेत आहे. कृषी क्षेत्रासह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान कार्यालयानं नेमलेल्या अभ्यास गटासोबत अर्थ मंत्रालय यासंदर्भात अभ्यास करत आहे. कोरोनाच्या काळात किती नुकसान सोसावं लागलं. त्यासंबंधातील अभ्यास करून पॅकेज तयार करण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, पॅकेज तयार झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मांडले जाणार आहे. बैठकीत चर्चा झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. या अगोदर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत 1 लाख 70 हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं होतं.