कोल्हापूर- 14 एप्रिलला देशातली टाळेबंदी संपल्यानंतर महानगरं आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
टाळेबंदीचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते आणि वास्तव हे वेगळं आहे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
ग्रामीण भागात 14 एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी आमची मागणी आहे. कारण खेड्यांमध्ये कोरोनाचा फार प्रसार झालेला नाही. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक यांसारखे बाधित भाग सोडले तर महाराष्ट्रात इतरत्र लॉकाउनचे निर्बंध 14 एप्रिलनंतर उठवण्यात यावेत अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे.