मुंबई | कोरोनाने घातलेला थैमान रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं आहे. यामुळे देशभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम झाला आहे.
मजूर, शेतीविषयक साधने व इतर संसाधनांच्या अनुपलब्धतेमुळे संपूर्ण कृषी कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
भारतातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शेतकर्यांची परतफेड करण्याची क्षमता पूर्णपणे बिघडली असल्याचं सांगितलं आहे. अशा संकटकाळात केंद्र सरकारने हस्तक्षेप करत त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि त्वरित दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्यात, असं आवाहन पवारांनी काल सकाळी जनतेशी संवाद साधताना केलं आहे.