मागील तीन ते चार दिवसांपासून भारतात कोरोना बाधित नागरिकांची संख्या वाढत असल्याचे आपल्याला विविध माध्यमांद्वारे समजत आहे. भारतात ३० नागरिक कोरोना ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.या नागरिकांवर दिल्ली जवळील आयटीबीपी छावणीत उपचार सुरू आहेत . भारतातील वाढत्या कोरोना ग्रस्तांची संख्या पाहता साहजिकच हा आता आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे .फेसबुक ,व्हॉट्सॲप आणि इतर समाज माध्यमांवरील व्हायरल संदेश, चित्रफिती ,छायाचित्रे पाहून सामान्य भारतीयांच्या मनात आता भीती निर्माण होत आहे .विशेषतः चीनमध्ये कोरोना ग्रस्तांच्या झालेल्या मृत्यूंमुळे अशी घाबरवून टाकणारी परिस्थिती झाली आहे.
यापूर्वीदेखील जगाने व भारताने अशा अनेक घातक आजारांच्या घटना बघितल्या आहेत .परंतु आताच्या घटनेने सर्व जगाला धास्तावून टाकले आहे .जागतिक अर्थव्यवस्था घसरणीला लागते आहे .
असे का ?
याचे कारण आहे ,आजच्या काळातील प्रतिव्यक्ती सहज उपलब्ध झालेली माहिती व बातमी ची पोहोच. अशी परिस्थिती यापूर्वी नव्हती .
2003 : सार्स - फेसबुक नव्हते, व्हाट्सऍप नव्हते.
2009 : स्वाइन फ्लू - फेसबुक नवीन होते (150 मिलियन युजर्स)
2014 : इबोला - इंटरनेट महाग होते, (व्हाट्सअप 450 मिलियन युजर्स)
2020 : कोरोना - व्हॉट्सऍप 2 बिलियन युजर्स ,फेसबुक 169 बिलियन युजर्स
कोणतीही बातमी आता झपाट्याने पसरते आणि व्यक्ती प्रति व्यक्ती अधिक परिणामकारक होत जाते.
पण मग कोरोना घातक नाही का?
यासाठी आपण काही आकडेवारी पाहू,
जगात 95 हजार 488 नागरिकांना सध्या कोरोना ची लागण झाली आहे. यातील 3 हजार 286 लोकांचा मृत्यू झाला आहे .यात एकट्या चीनमधील 3 हजार 13 लोकांचा समावेश आहे.
आजाराची लागण झालेल्या पैकी मृत्यू होणाऱ्या लोकांची टक्केवारी पाहता, यापूर्वी सार्स या आजाराने १०%, स्वाइन फ्लूने ४.५% ,इबोला ने २५% बाधितांचा चा मृत्यू झाला होता. कोरोना च्या बाबतीत ही संख्या केवळ ३% आहे.
आणि आता चीनमध्येही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे समजते आहे .कोरोना घातक असला तरीही ,आपण घाबरून जाऊन इतरांनाही घाबरवणे सोडून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
आम्ही काय करावे ?
- आजाराला प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असतो.
- स्वच्छतेच्या सवयी कटाक्षाने पाळाव्यात .
- साधारण सर्दी ,ताप असेल तरीही त्वरित उपचार घ्यावा.
- शक्यतो गर्दीच्या ठिकाणी व प्रवासावेळी मास्क वापरा.
- नियमित हात धुवा .
- लहान मुलांची आणि वृद्धांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांची विशेष काळजी घ्या.
- डोळे नाक व तोंडाला वारंवार हात लावू नका.
आणि सर्वात महत्वाचे अफवा पसरवू नका.