मुंबई | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल.
कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे 200 कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दुधउत्पादक शेतकरी संकटात आहे. दूध विक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 हजार दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे.